Search This Blog

Sunday, 13 August 2017


"माझं वय २६ वर्षे ३ महिने.
खरंतर मी आजवर अनेकांना भेटलो. बोललो.
 पण, मला तू जितकं समजून घेऊ शकतेस तितकं कुणीच समजून घेऊ शकत नाही आई."
तो आईजवळ कबूली देत होता. कन्फेस करत होता.
आईने अलगद त्याच्या केसातून हात फिरवला अन एक ठेवणीतली स्माईल देत म्हणाली,
" तू माझ्यासाठी २७ वर्षांचा आहेस रे !"

तो आश्चर्याने आईकडे पाहू लागला.
आणि त्याला अचानक उमगलं. तो छानसं हसला.
'आईचं लौजिक एकदम करेक्ट होतं. कारण ती त्याच्यापेक्षा नऊ महिन्यांनी पुढं होती.'
.................................................................................................

मूळ पोस्ट: धवल बारोट
मराठी भावानुवाद: फारूक एस.काझी

Saturday, 4 June 2016


                     शिक्षक म्हणून काम करत असताना मी मुलांच्या लेखनावर दोन तीन वर्षे काम करत होतो.तो भाग होता "भाषेच्या अंगणात" या उपक्रमाचा.मूल व्यक्त होत असतं ते ना ना माध्यमातून. मी लिखित माध्यमातून त्यांची अभिव्यक्ती शोधत होतो.एकदम छोटा उपक्रम. साधारण तिसरी चौथीच्या मुलांसोबत केलेला. खूप रंग पाहता आले भाषेचे. त्यातून मी मूल समजून घ्यायला शिकत गेलो. त्यांचे विचार, भावना, त्यांच्या एकंदरीत जाणीव व व्यक्तिमत्त्वाच्या घडणीतील काही बाबी समजू लागल्या होत्या.
                   हा एक प्रयत्न होता मुलांना स्वत:च्या भाषेत व्यक्त होण्याची संधी देण्याचा. मेई ती संधी दिली. अन एक सुंदर भाषिक अनुभव मला घेता. २०१४ च्या ' Active Teacher Forum" च्या शिक्षक संमेलनात मला या उपक्रमाचं सादरीकरण करण्याची संधी मिळाली. तिथे MKCL प्रस्तुत व 'सह्याद्री" वाहिनीवरून प्रसारित झालेल्या "माझी शाळा" च्या टीमने लाइव्ह रेकॉर्डिंग केलं होतं. त्यातून आकाराला आला तो माझी शाळा मधील "भाषेच्या प्रांगणात" हा भाग. अगदी छोट्याश्या वस्तीवर झालेलं हे काम माझी शाळा या मालिकेतून येणं हा क्षण खूप मोठा आनंद देणारा होता.
                  मित्रहो, मूल स्वत:ची भाषा शाळेत घेऊन येतं, त्याचा आदर करणे हे आपलं पाहिलं कर्तव्य. त्याच्या आनंदात सहभागी होण्याची संधी. हा विडीयो पाहुन जरूर लक्षात येईल की मूल किती तऱ्हेने व्यक्त होत असतं. भाषेचा गोडवा काय असतो.    [विडीयो सौजन्य : MKCL, माझी शाळा, सह्याद्री वाहिनी.]


भेट

                    ७ मे. शाळेचा शेवटचा दिवस. एक वर्ष संपलं. खरं तर नियमानुसार निकाल १ मे ला द्यायचा. पण मी यावर्षी तो राखून ठेवला अन ७ मे ला देईन असं सांगितलं. माझ्याकडे दुसरी व चौथी असे वर्ग होते. दुसरीची मुलं तिसरीसाठी माझ्याकडे असणार होती. पण चौथीच्या मुलांना बाहेर जावं लागतं. त्यांची अधून मधून भेट होणार होती पण का कुणास ठाऊक पण यावेळी मला त्यांना शेवटच्या दिवशी भेटायचं होतं. चौथीच्या मुलांचे हायस्कूलमध्ये पाचवीचे तास सुरु होणार होते.
                      ७ तारखेला सकाळी चौथीतल्या प्रीतीचा फोन आला. “सर, आम्ही साडे अकरापर्यंत येतो .तुम्ही आम्हाला भेटल्याशिवाय जाऊ नका.” मी होकार दिला. तसं तर आजवर असे बारा वर्षांचे शेवटचे निरोप घेतलेत मुलांचे. तसाच हाही एक असं समजून मी शाळेला गेलो. अकरा वाजता मुलं आली. हसणं, चेष्टा-मस्करी, गप्पा, हायस्कूलमध्ये घडत असलेल्या गमती-जमती अन तक्रारी हे सर्व सुरु झालं. पाहता पाहता साडेबारा झाल्या. मी म्हणालो, “ पोरानो, चला फार उशीर झाला. सकाळी गेलाय तुम्ही शाळेला. भूक लागलीय की नाय?”
“थांबा की व सर, आमी एवडं तुमाला भेटायला आलुया आन तुमी मजी चला चला करताय!” प्राजक्ता तिच्या नेहमीच्या फक्कड स्टाईलमध्ये बोलली. मला का कुणास ठाऊक क्षणभर गलबलून आलं. आम्ही परत गप्पात रंगून गेलो. मुलं अजूनही अवती-भोवती घुटमळत होती.
“सर, आपल्या इथं लई मज्जा इती बगा. तसं कुटंबी वाटत न्हाय”
मुलांच्या ह्या मायेवर तर शाळा अन शिक्षणाचा डोलारा उभा आहे. वाट मळती राहतीय. ऊन वाढू लागलं तसं मी मुलांना घरी जायला आग्रह केला. मुलं अजून रेंगाळतच होती.
मी वर्गाला कुलूप लावलं अन बाहेर आलो. का कुणास ठाऊक माझी अवस्थाही मुलांसारखीच झाली होती. पाय निघत नव्हता. परत परत मी शाळेकडे वळून पाहत होतो. मला किंचितही कल्पना नव्हती की आजचा दिवस हा माझा या शाळेतील शिक्षक म्हणून ‘शेवटचा दिवस’ होता. ही माझी शेवटची भेट होती. जड मनानं मी बाहेर पडलो.
        सुट्ट्यात बदल्या झाल्या. मीही बदलून गेलो. कुणालाच कल्पना नाही दिली. आता नवीन प्रवास करायचा होता. नवीन शाळा, नवीन सहकारी, नवीन स्वप्नं अन नवनवीन प्रयोग. माझी जुनी शाळा, मुलं गावकरी यांचं प्रेम सोबत घेऊन हा प्रवास सुरु झाला. भरभरून दिलं मला सर्वांनी. गावकरी, पालक, आणि सर्वांत जास्त माझ्या शाळेतल्या त्या सर्व चिमुरड्यांनी.मी चांगला शिक्षक आहे की नाही माहित नाही. पण मी नेहमी चांगला शिक्षक बनण्याचा प्रयत्न करत आलो. करत राहीन. कारण ते एकच मोठं स्वप्न माझ्या डोळ्यात सतत तरळत असतं. त्यातून मी लिहिता होतो. मांडत राहतो. आता नव्या प्रवासात नवीन स्वप्नं सोबत घेतलीत. पूर्ण करायला झटत राहीन.
            जीवनात आधार अन विरह देणाऱ्या भेटी, घडत रहायला हव्यात. त्यातून जगण्याची मजा कळत जाते. बेचव आयुष्याला ‘चव’ येत जाते.

Tuesday, 24 May 2016



कंगव्याची गोष्ट
#####################
मागच्या शुक्रवारी सांगोल्याच्या स्टँडवर मित्राची वाट पाहत होतो.अलफाज सोबत होता. बुकस्टॉलवरून मी मटा घेतला. स्टॉलच्या शेजारीच चॉकलेट, बिस्कीट इ. चा स्टॉल आहे. मी अलफाजला तुला काही हवंय का असं विचारलं. त्याने थोडावेळ पाहून हात केला. मी पाहून हसू लागलो, बहाद्दराला काय हवं होतं माहितीय?
'
कंगवा' तोही त्याच्या शर्टला मँच करणारा.
मी जाम हसू लागलो. दुकानदार व शेजाारी उभे सर्वचजण हसत होते. अलफाज थोडं लाजला अन छोटा कंगवा खिशात ठेवून दिला.
खाण्याची वस्तू न मागता कंगवा मागणारा अलफाज पाहून ते सगळे हसत होते. मित्र म्हणाला, "बाप नेहमी असाच विचाार करतं जगावेगळा ,मग पोरगं कसं चुकेल?"
यावर मी फक्त हसलो.
अशी तुलना कधीच होऊनये. कारण यातून मुलांची व्यक्तीमत्वं फुलत नाहीत, उलट सावलीत खुरटून जातात. कधीच अशी तुलना करू नका. अलफाजचं माझं नातं मैत्रीचं आहे. आम्ही वाद घालतो, चर्चा करतो, एकमेकांच्या उणीवा दाखवतो, जाम वैतागतोही एकमेकांवर.. मी निश्चितच त्याच्या व्यक्तिमत्वाचा आदर करायला शिकलोय.

#####

प्रत्येक मूल स्व प्रतिमा जपत असतं अन एक तुमच्या जडणघडणीचं महत्त्वाचं वैशिष्ट असतं. अलफाज कंगवा घेतो म्हणजेच स्वत:चे केस नीटनीटके रहावेत व ते चांगले दिसावेत ही भावना. कदाचित माझ्याकडे किंवा त्याच्या दहावीतल्या चाचूंकडे पाहिलेल्या कंगव्यामुळे त्याला तो घ्यावासा वाटला असेल. पण, यातून एकच गोष्ट समोर येते ती ही की "मूल स्वत:ची प्रतिमा जपत असतं" मग ते दिसायला कसं का असेना.
आपण मुलांना सतत येताजाता काळ्या, नकट्या, बुटक्या अशा उपाध्या लावत हिंडत असतो. एकप्रकारे उमलू पाहणारं रोपटं सपासप वार करून आपण ते छाटत असतो.
हे साधे प्रसंग आहेत पण हे मुलांच्या मनावर खोलवर परिणाम करतात. ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला असं कुणी म्हटलेलं खपतं का? नाही ना!! मग मुलांचा विचार कधी करणार?

Sunday, 20 December 2015

अनवट वाटांच्या राहगीर ....!!! -प्राचार्य लीलाताई पाटील.




# मला भेटलेल्या लीलाताई ....
                                    खरं तर लीलाताईची भेट ही माझ्या जीवनातील एक मोठा बदल घडवणारी गोष्ट ठरली. मी डी.एड.ला असताना ताईंची एक दोन पुस्तकं वाचली होती. तेव्हा शिक्षक म्हणून स्वत:ची भूमिका कुठं मूळ धरू लागली होती. शिक्षक झाल्यानंतर झपाटून जाऊन लीलाताईंना वाचून काढलं. मला माझं शिक्षकपण समजून घ्यायचं होतं. एक शिक्षक म्हणून मला स्वत:ला सिद्ध करायचं होतं.२००७ पासून लीलाताईशी पत्रव्यवहार सुरु झाला. फोनवरही बोललो. ताई खूप कडक शिस्तीच्या आहेत जरा जपून वाग. असा प्रेमळ सल्ला मला मित्रांकडून मिळाला होता. त्याचा अनुभव मी घेतलाही. परंतु ताईनी खूप जीव लावला आणि तालमीत तयार करायलाही सुरवात केली. ताईंची भेट मंजे प्रत्यक्ष कार्यशाळाच झाली होती माझ्यासाठी. अंतरामुळे मला वारंवार कोल्हापूरला जाणे शक्य होत नसे. तरी त्या मला फोनवर अभ्यास देत व त्या हक्काने करवून घेत. त्यांचे डोळे खूप तेज असलेले व सतत कशाचातरी शोध घेत असलेले आहेत. त्या समोरच्या माणसाचं अंतरंग वाचत असतात.परंतु मधूनच एखादा मिश्कील विनोद करून हसवतील ही. “तुम्ही फार आळशी आहात .!”.हे माझ्याविषयीचं त्यांचं मत तंतोतंत बरोबर आहे.
                                    शिस्तबध्द लीलाताईच्या आत लपलेल्या एका प्रेमळ शिक्षिकेला मी सतत भेटत आलोय. कोणतंही काम नियोजनपूर्वक व पूर्वतयारीने कसं करावं याचा त्या वस्तुपाठच मला देत असत. त्यांच्या संपर्कातील काही लोक [माझ्यासकट] अगदी त्रासून जात ,परंतु त्या आपला हट्ट सोडत नसत. लीलाताईना नेहमी वाटे चांगलं काम करणारे शिक्षक महाराष्ट्रभर पसरलेले आहेत,त्यांना एकत्र आणायला हवं. छोटे छोटे दिवे एकत्र आणले तर त्यांची मशाल बनेल व त्यांचा प्रकाश एक नवीन वाट निर्माण करेल. आम्ही सांगोल्यात २००८ साली माताबालक उत्कर्ष प्रतिष्ठान यांच्या सोबत व श्री. संजय मालपाणी यांच्या सहकार्याने शिक्षकांची दोन दिवसांची कार्यशाळा घेतली. आणि मग समविचारी शिक्षकाना एकत्र आणण्याचं काम सुरु झालं. आज whatsapp मुळे हे काम अधिक सोप्पे झाले आहे. ताईंच एक स्वप्न प्रत्यक्षात येत आहे.

# शिकण्याचा हक्क जोपासणारी विद्यालये हवीत.
                                   लीलाताई आपल्या पुस्तकातून नेहमी हीच भूमिका मांडत आल्या आहेत. ‘शिकणे म्हणजे स्वातंत्र्य मिळवणे’ या कार्व्हर च्या विचारांशी त्या एकजीव होतात. मुलांना जसा इतर गोष्टींचा हक्क असतो तसाच तो शिकण्याचा ही असावा असं त्यांचा सतत आग्रह असे. त्यामुळेच की काय ‘सृजन आनंद विद्यालयातील’ मुलांना स्वतंत्रपणे विचार करायला लावणे,चिकित्सा करणे, कार्यकारण भाव शोधणे इत्यादी सवयी अगदी लहान वयापासून लागाव्यात यासाठी त्यांचा आग्रह राहिला आहे.
वार्गातील वातावरण हे लोकशाही पध्दतीचं असावं, शिक्षकांनी हुकुमशहा न बनता मुलांचे मित्र ,सहयोगी बनून काम करावं. अध्यापनातला आनंद घ्यावा. अध्यापनाची सुंदर व्याख्या त्या करतात. “अभ्यासक्रम आणि क्रमिक पुस्तक यांचा एकूण आवाका लक्षात घेऊन शिक्षकानं सभोवतालच्या वास्तवाची केलेली उपसाउपस ,उकल आणि सांधेजोड म्हणजेच अध्यापन होय.”
                                    त्या जिथं शिक्षण घडतं त्याला शाळा म्हणत नाहीत. उलट ही सृजन व आनंद पेरणारी विद्यालये आहेत...असं त्या सतत मांडत असतात. हे शिकणं म्हणजे नेमकं काय ? तर ...”सकस व प्रयोगशील शिक्षणाचं मुख्य ध्येय माणूसपण जागवणं, शिकतेपणाच्या विविध अंगांना खतपाणी घालून अध्यानोत्सुक मन तयार करणं” [शिक्षणातील लावण्य.] याचाच अर्थ असं की केवळ घोका व परिक्षा नावाच्या काही तासाच्या कसोटीत ते ओका इतकंच शिक्षण नाही. हे बादलीभरू शिक्षण जे केवळ एकाच छापाचे विध्यार्थी तयार करते..”माणूस व माणूसपण “ नव्हे. शिक्षणाची ही रूळलेली चौकट मोडून नव्या पायवाटा निर्माण करणं हेच शिक्षकाचं ध्येय असायला हवं. त्यातूनच शिकण्याचा हक्क जोपासणारी विद्यालये तयार होतील.


# सृजन आनंद विद्यालयाची जन्मकथा.....
                                     “ही शाळा का केली?” असा प्रश्न लीलाताईंना नेहमी विचारला जातो.याविषयी काही बाबी त्यांनी त्यांच्या नव्या पुस्तकात [प्रवास ध्यासाचा...आनंद सृजनाचा ,२०१२] लिहिल्या आहेत. अधिकारी –प्राचार्य,प्रयोगशील शिक्षिका ..या सर्व प्रवासातलं वाचन, मनन,चिंतन आणि अनुभव या सर्वांचा परिणाम म्हणून त्यांच्या मनात सतत एक स्वप्न विलसत होतं. ते होतं लोकशाही मार्गाने चालणारी व प्रत्येक मुलाचं स्वातंत्र्य जपणारी आणि शिकण्याची लालसा निर्माण करणारी शाळा त्यांना उभारायची होती. ‘हाताची घडी तोंडावर बोट’ यामुळे पाठ्यपुस्तक व परीक्षा यांच्या आवर्तनात भिरभिरताना प्राथमिक शाळेतील पोरांना आपलं औत्सुक्य कोंडून ठेवावं लागतं.तेच स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी सृजन आनंद वर्ग सुरु केला. पत्ता ,सौरभ,रुईकर कॉलनी ,कोल्हापूर. म्हणजे ताईंचं राहतं घर. सुरवातीला काही प्रयोग करून ‘सृजन आनंद विद्यालय’ सुरु झालं. त्या एवढंच करून राहिल्या नाहीत तर सृ.आ.वि. हे प्रयोगशीलतेचं बेट होऊ नये,तर हे प्रयोग सार्वत्रिक व्हायला हवेत यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. त्यांचं लेखन, त्यांची पुस्तके, व्याख्याने यातून केवळ अन केवळ गुणवत्तापूर्ण तसेच जगण्याचा भाग बनणारं शिक्षण हाच विषय असतो. आजही ही “ ८८ वर्षांची तरूण शिक्षिका’ त्या ध्यासापायी धडपडते आहे.
                                  ‘ सृजन आनंद विद्यालयाच्या’ जन्मकथेला एक दुखरा कोपराही आहे. लीलाताई एकीकडे कुटुंबाची जबाबदारी सांभाळत होत्या दुसरीकडे आपली प्रशासकीय सेवा निभावत होत्या. या सर्वांत कुठे ना कुठे त्यांच्याकडून ‘श्रीरंग’ त्यांचा एकुलता एक मुलगा याच्याकडे दुर्लक्ष होत राहिलं.त्याचं बालपण त्याना अनुभवता आलं नाही.अगदी लहान वायात पोक्त झालेला श्रीरंग कशासाठीही हट्ट करत नसे हा श्रीरंग ऐन तारुण्यात अपघातात मरण पावला. लीलाताईंच्या मनाला ह्या ओरखडयाची जखम कायम सलत राहिली. अजाणतेपणी आपण श्रीरंगवर अन्याय केल्याची रुखरुख त्यांना खात राहिली.त्याची भरपाई म्हणून मुलांसाठी काहीतरी करावं ही अस्वस्थता शांत बसू देईना.त्यातून ‘सृआवि’ ची पायाभरणी सुरु झाली. ‘प्रवास ध्यासाचा...आनंद सृजनाचा’ या पुस्तकात याबाबत सविस्तर लिहिलं आहे ताईंनी.


# शिक्षकमाणूस .......
                                       व्यवहारात आपण नेहमी ‘बाईमाणूस’, ‘गडीमाणूस’ असे शब्द वापरत असतो. परंतु शिक्षक हाही एक माणूस असतो हे आपण विसरत राहतो. त्यासाठी लीलाताई ‘शिक्षकमाणूस’ ही एक व्यापक संकल्पना मांडतात. ती केवळ शिक्षक एवढ्या पुरती मर्यादित राहत नाही..तर एक व्यापक संकल्पना बनते. जी कालातीत आहे. शिक्षकमाणूस म्हणून काय काय हवं......
१] मूल विचार करू शकतं यावर शिक्षकाचा विश्वास हवा.
२] मुलानाही हक्क आहे प्रश्न विचारण्याचा,टीका करण्याचा ,चुकीला ‘चूक’ असे निर्भयतेने म्हणण्याचा.
३] स्वत:च्या बुद्धीला जे पटतंय ते स्वीकारणे.
४] स्वत: सतत प्रयत्नशील असणं. अपयश येईल याची चिंता नको.
५] बालककेंद्रित, आनंददायी,सृजनशील व अनुभवजन्य अर्थपूर्ण शिक्षण देऊ शकणारा.
६] मुलांवर विश्वास हवा.
७] चाकोऱ्या मोडण्याचं धाडस व परिणाम सहन करण्याचं धैर्य.
८] ‘बदल घडतो....’ यावर दृढ विश्वास हवा.
९] आपल्या हाती असलेल्या साधनांत काय योग्य ,काय अयोग्य हे ठरविण्याचा अधिकार शिक्षकाला ह्वां.
१०] शिक्षकमाणसाने आपलं स्वातंत्र्य घ्यावं. ण घालून दिलेले नियम ही आपण पाळत राहतो. त्यातून बाहेर पडायला हवं.
११] इतर शिक्षकांशी सतत संवाशील असायला हवं.

लीलाताईची पुस्तकं ही असा शिक्षकमाणूस घडवणारं उत्तम माध्यम आहे.विशेषत: मराठी अध्यापन हा लीलाताईंचा जीव की प्राण.त्यात त्यांनी अनेक प्रयोग करून पाहिले.सृआवि त अश्या प्रायोगांना लिखित रूप देऊन ठेवलं गेलंय. ते मोठे साधन आहे. लीलाताई या जणू प्राथमिक शिक्षणाचं एक ‘स्वतंत्र विद्यापीठ’ आहेत. तरीही राजन गवस यांनी मात्र एक वाक्य वापरल्याचं आठवतंय. “लीलाताई म्हणजे एक कविता. जी महाराष्ट्राला कळाली नाही.” लीलाताईची फारशी दखल घेतली गेली नाही हेच यातून स्पष्ट होते.





ती नदी
ती शाळा





ती देते
ती घेते
ती प्रेम भरते
कधी कधी रागावते
स्वत: ला समजावते
आणि
तुम्हालाही..
ती अगदी स्वतंत्र असते....
खळाळते
तिचं स्वातंत्र्य
आणि तिचा प्रवास
या तिच्या जिवंतपणाच्या खुणा...
.
.
नदीकडून आपण शिकायचं
देणं आणि घेणं
प्रेम करणं आणि रागावणं
पण, विसरायचं कधीच नाही...
जिवंत असणं आणि खळाळणं
स्वतंत्र असणं आणि ...
प्रावास करणं....

.
.
-लीलाताई पाटील. [‘शिकण्याच्या वाटेवरचं आनंदवन’ मधून साभार.]
.
.
[सदर लेख डिसेंबर २०१५ च्या 'ऋग्वेद' मासिकात प्रसिद्ध झाला आहे. तसेच पूर्ण लेख वाचण्यासाठी भेट द्या. myworld/farukskazi.blogspot.com]